मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्यांचा इतिहासच गद्दारीचा आहे, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. (Maharashtra Politics)
शरद पवारांनी राजीनामा दिल्यावर जयंत पाटील का रडत होते, याचे कारण अद्याप कोणालाही माहीत नाही. कदाचित उद्या काय घडणार याची माहिती जयंत पाटलांना होती. म्हणूनच ते रडत होते. शरद पवारांनी राजीनामा दिला म्हणून जयंत पाटील यांना रडू आले नव्हते. त्याचे कारण वेगळे आहे. काही दिवस वाट पाहा, जयंत पाटलांचे मार्गक्रमण कुठेतरी झाल्याचे तुम्हाला दिसेल, असे संजय शिरसाट म्हणाले.
शिवसेनेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही 20 जून गद्दार दिन असल्याचे सांगत शिंदे गटाला लक्ष्य केले. त्यावर शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा का पुळका आला, हे कळायला मार्ग नाही, असे सांगत ज्या पक्षाची स्थापनाच मुळात गद्दारीतून झाली, ते आम्हाला गद्दारीची भाषा शिकवत आहेत. हे सर्व हास्यास्पद आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला.
शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. पुढे सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसशी गद्दारी केली. आता त्यांना उद्धव ठाकरे यांची पाठ खंजीर खुपसण्यासाठी चांगली वाटत असावी, असा हल्ला शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर चढविला.
शिरसाटांपेक्षा माझी विश्वासार्हता जास्त : आ. जयंत पाटील
इस्लामपूर : संजय शिरसाटांपेक्षा माझी क्रेडिबिलिटी (विश्वासार्हता) जरा जास्त असेल नाही का? त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी प्रतिक्रिया घेणं म्हणजे जरा जास्तच झालं, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर माध्यमांशी फारसे बोलणे टाळले. आ. शिरसाट यांनी 'राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील' असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार भाजपात येणार असा दावाही सातत्याने शिंदे गट करत होता. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबतही हे वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे