पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले. आणि शिवसेनेच्या दोन खासदारांनी शिंदे गटाशी घरोबा केला. याचा धक्का जिल्ह्यातील शिवसेनेला बसला आहे. तर काँग्रेसचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पाटील (Satej Patil) यांनी पहिल्यांदाच मंडलिक यांच्या बंडखोरीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाटील (Satej Patil) म्हणाले की, संजय मंडलिक दिल्लीला जाताना मला भेटून गेले होते. शिंदे गटासोबत त्यांनी जाऊ नये, अशी विनंती आम्ही त्यांना केली. मात्र, मंडलिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या सोबत राहतील, अशी आशा आहे. मंडलिक यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय दुख:द आहे. सहकारामधील प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही एकत्र आलो होतो. शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार भाजपसोबत का गेले ? यामागे काय कारणे आहेत, हे येत्या दोन महिन्यात समोर येईल. देशामध्ये सुडाचे राजकारण सुरू आहे, आजवर असे कधीही झाले नव्हते, असाही आरोप पाटील यांनी यावेळी भाजपवर केला.
विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसने भारत जोडो अभियान सुरू केले होते. त्यावेळी कारवाई करण्यात आली. परंतु अशा दबावाला काँग्रेस कधीच बळी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात अद्याप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री मिळायला हवा. सरकारने संकट काळात मदत केली पाहिजे. नंतर केवळ पंचनामे करणार का? अशीही टीका त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केली.
हेही वाचलंत का ?