सांगली ः पुढारी वृत्तसेवा : गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्याला उन्हाचा तडाखा बसत आहे. पारा दररोज सरासरी 40 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. यंदाच्या उन्हाळ्यात केवळ दोन-तीनच पाऊस झाल्याने वातावरण थंड झालेले नाही. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पिके करपू लागली आहेत. पक्षी, प्राण्यांचे हाल सुरू आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा उन्हाळा अधिकच कडक जाणवत आहे. फेब्रुवारीपासून तापमान वाढत आहे. मार्च महिन्यात दाह अधिकच वाढला होता. एप्रिल महिन्यात तर जिल्हा भाजून निघत आहे. मागील महिन्याभरात दररोज सरासरी तापमान किमान 38 ते कमाल 41 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. दुष्काळी भागात पारा 42 पर्यंत जात आहे. हे तापमान उच्चांकी आहे.
उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वृद्ध व बालकांना फारच त्रास होत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी लोक विविध उपाययोजना करीत आहेत. पंखे, कुलर, एसी यांचा वापर वाढला आहे. घराचे तापमान नियंत्रणात राहण्यासाठी छतावर कोटिंग कलर देण्याचे प्रमाण वाढले आहे. थंड पेये, टोप्या, पांढर्या कपड्यांची मागणी वाढली आहे. बहुतांशजण दुपारी प्रवास टाळत आहेत. यामुळे सांगली, मिरज, इस्लामपूर या शहरांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्ते ओस दिसून येत आहेत.
कडक उन्हामुळे पिके करपू लागली आहेत. नदीकाठी शेतकरी पाणी देऊन पिके वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. पण महावितरणकडून वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. त्यामुळे पिके करपत आहेत. विशेषत: उन्हाळी सोयाबीनला मोठा फटका बसत आहे. केळी, ऊस, भाजीपाला या पिकांची पाने होरपळत आहेत. कवठेमहांकाळ, खानापूर, जत, तासगाव, आटपाडी या दुष्काळी तालुक्यात लोक व पिके भाजून निघत आहेत. जनावरे, पक्षी यांचेही हाल होत आहे. सावली अथवा निवार्याची सोय केली तरी दुधाळ जनावरे आजारी पडत आहेत. पक्षीही पाण्याच्या शोधासाठी वणवण भटकताना दिसत आहेत.