उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. तीन ऑक्टोंबर रोजी झालेल्या हिंसेप्रकरणी दोन वकिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणाशी संबधित मंत्र्यांवर गुन्हा दाखल करून शिक्षेची मागणी केली आहे.
या याचिकेत गृह मंत्रालय आणि पोलिसांना मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याबाबत मागणी केली आहे.
तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याच मागणीही केली आहे. मात्र, सुप्रीम कोर्ट सीबीआयला या प्रकरणाचा निश्चित कालमर्यादेत तपास करण्याबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे.
लखीमपूर खिरी प्रकरण तीन दोन दिवसांनंतरही चिघळत चालले असून या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे शवविच्छेदन झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.
शवविच्छेदन अहवालात फेरफार केल्याचा आरोप करत लवप्रीत सिंग यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारच करणार नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी लखीमपूर येथे मझगईच्या चौखडा फार्मवर जाऊन लवप्रीत सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की नानपारा बहराइचचे शेतकरी गरुविंदर सिंग यांचा मृत्यू गोळी लागल्यामुळे झाला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्याचा उल्लेख नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याला वाचविण्यासाठी शवविच्छेदन अहवाल बदलला आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले असून शेतकऱ्यांनी पोलिसांशी चर्चा करताना शांततापूर्ण आंदोलनाचे आश्वासन दिले होते. मात्र अचानक वाहनांवर दगडफेक केली गेली. ड्रायव्हरसह तीन लोकांना मारहाण झाली. तीन लोक जखमी झाले. त्यानंतर ही घटना घडली. शेतकऱ्यांवर जाणूनबुजून गाडी चालविली नाही. दगडफेक सुरू असल्याने वाहन पुढे नेताना ही दुर्घटना घडली आहे.
दरम्यान, एका वृद्धाला जीपने धडक दिल्यानंतर त्याने बोनेटवर उडी मारली आणि नंतर ते जमिनीवर पडले. या अनपेक्षित घटनेने घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघात झालेल्यांना तातडीने बाजुला करत उपचारासाठी पाठण्यात आले.
उत्तर प्रदेशातील खिरी लखीमपूर येथे हेलिपॅडवर सुरू झालेल्या शेतकरी धरणे आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले.
यावेळी अनेक गाड्यांची मोडतोड करण्यात आली. काही गाड्या पेटवण्यात आल्या. या हिंसाचारात आतापर्यंत ९ ठार झाले.