Latest

नाशिक : हमाली, तोलाईसंदर्भातला निर्णय दोन महिने लागला नाही, तर कांदा उकिरड्यावर फेकायचा का? सभापतींची आक्रमक बाजू

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
अतिशय दुष्काळी परिस्थितीत शेतकयांनी पोटाला चिमटा देऊन कांदा पिकवला आहे. हमाली, तोलाईसंदर्भातला निर्णय दोन महिने लागला नाही, तर कांदा उकिरड्यावर फेकायचा का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत सभापती शशिकांत गाडे यांनी व्यापाऱ्यांना बुधवार (दि. १०) पासून कांदा लिलाव पूर्ववत करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, शेतकऱ्यांना नुकसान परवडणारे नाही, असे स्पष्ट करीत गाडे यांनी आक्रमकपणे शेतकऱ्यांची बाजू मांडली.

माथाडी, मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई, साराई वयात व लेखी संदर्भात तोडगा निघालेला नसल्यामुळे दि. २८ मार्चपासून सिन्नर बाजार समितीत लिलाव ठप्प आहेत. यासह विविध प्रश्नांवा चर्चा करण्यासाठी बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यावेळी गाडे बोलत होते.

सध्या लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यात हे प्रकरण अडकले, तर निर्णय कधी लागू शकेल, याचे काहीच सांगता येणार नाही. असे व्यापाऱ्यांच्या वतीने बाळकृष्ण चकोर यांनी सांगितले. व्यापारी एकीकडे हमाल, मापारी यांच्या हमाली, तोलाई संदर्भाने अडून बसलेले असताना दुसरीकडे काही व्यापारी बाहेरच्या वजनकाट्यावर वजन करून बाजार समितीच्या मागच्या प्रवेशद्वाराने कांदा लिलाव करून खळ्यावर आणत असल्याची बाब सभापती गाडे यांनी व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर असे आढळल्यास एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

…तर कांदा लिलाव लगेच सुरु करू'
कांदा लिलाव सुरू करण्याबाबत सभापती गाडे यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर व्यापा-यांनीही भूमिका स्पष्ट केली. शेतमालाच्या पट्टीत हमाली, तोलाई येऊ देऊ नका, आम्ही तत्काळ कांदा लिलाव सुरू करतो. आमची काहीच अडचण नाही, असे संचालक सुनील चकोर यांनी सांगितले. मात्र त्यावर जास्त चर्चा झाली नाही.

'माल घ्यायचाय? पैशांची तरतूद करा'
समितीने शेतमालाचे पैसे शेतकर्‍यांना रोख स्वरूपात देण्याची पद्धत अवलंबिली आहे. तथापि, काही व्यापार्‍यांकडून पैसे रोख दिले जात
नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर या विषयावर गरमागरमी झाली. एका व्यापार्‍याचे नाव समोर आल्यावर त्याने चांगलेच आकांडतांडव केले.
तथापि, व्यापार्‍यांनी त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, कांदा घ्यायचा असल्यास शेतकर्‍यांनी लिलावाअगोदर अथवा आदल्या
दिवशी आगाऊ पैशांची तरतूद करून ठेवावी, असे आवाहन बाळकृष्ण चकोर यांनी केले.

उन्हामुळे लिलाव सकाळी साडेदहालाच होणार
उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. मात्र अशाही स्थितीत 11 ला ठरलेले लिलाव बर्‍याचदा तास-दोन तास उशिरा सुरू होतात. ही बाब चांगली नाही. व्यापारी अथवा कर्मचारी लिलावापुरते तास दोन तास उन्हात असतात. मात्र शेतकरी 12 ही तास उन्हातच असतो. त्यामुळे त्यांचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे असे सांगत यापुढे सिन्नरसह नायगाव उपबाजारात शेतमालाचे लिलाव सकाळी साडेदहा वाजताच सुरू करण्याच्या सूचना यावेळी सभापती शशिकांत गाडे यांनी कर्मचार्‍यांसह व्यापार्‍यांना केल्या.

गुरुवारपासून गोणी कांदा लिलावाची शक्यता
हमाल प्रतिनिधी व व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार निर्णय न झाल्यास, गुरुवार (दि. 11) पासून गोणी कांदा लिलाव सुरू करण्याचे संकेत सभापती शशिकांत गाडे यांनी दिले असून त्याबाबतीत ते प्रयत्नशील आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांची हेटाळणी होऊ देणार नसल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT