कोट्यवधी रुपयांचा चारा घोटाळा उघड करणारे निवृत्त आयएएस अमित खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरे ३० सप्टेंबर २०२१ ला उच्च शिक्षण सचिव पदावरून निवृत्त झाले. एकीकृत बिहारमधील पश्चिम सिंहभूमचे उपायुक्त म्हणून होते तेव्हा खरे यांनीच पहिल्यांदा चारा घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणात अनेक राजकारणी, अधिकारी – पुरवठादार तुरुंगात गेले आणि शिक्षाही झाली.
१९८५ बॅचचे आयएस अधिकारी खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याबाबत कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने आदेश जारी केला आहे. आयएएस अमित खरे यापूर्वी मनुष्यबळ आणि माहिती प्रसारण विभागाचे सचिवही राहिले आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अमित खरे यांना पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पीएमओमध्ये त्यांची कंत्राटी नियुक्ती भारत सरकारच्या सचिवांच्या रँक आणि स्केलवर देण्यात आली. ते दोन वर्षे या पदावर राहीतील.
सुमारे ३६ वर्षे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी म्हणून अमित खरे यांनी सेवा दिली आहे. जिथे जिथे त्यांनी आपली सेवा दिली आहे तेथील लोक आजही त्यांना एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखतात. झारखंड आणि बिहार सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे नवीन शिक्षण धोरण २०२० लागू करण्यात आले.
अमित खरे यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल केलेत. त्यांच्या नेतृत्वात भारताचे नवीन शिक्षण धोरण २०२० अंमलात आले. आयआयटी, आयआयएमसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था जागतिक दर्जाच्या बनवण्यावर भर दिला. त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवाचा अतिरिक्त कार्यभार दीर्घकाळ सांभाळला.