नाश्ता म्हणजे दिवसभराच्या तिन्ही जेवणांमधील सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक जेवण आहे, हे लक्षात घ्यावे. आपल्याकडील अनेक महिलांना भात, फोडणीची पोळी असे रात्रीचे उरलेले अन्न न्याहारीसाठी खाण्याची सवय असते. रात्रभर आपण काही खात नाही म्हणजे एकप्रकारे ब्रेक घेतो. ब्रेक घेऊन केलेला उपवास म्हणून तो ब्रेकफास्ट. अशा उपवासानंतर शरीराला पौष्टिक आणि ताज्या अन्नाची गरज असते. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला ऊर्जा, प्रथिने, मेद, खजिने, जीवनसत्त्वे अशा सर्वच पोषक तत्त्वांची गरज असते. त्यामुळे सकाळचा नाश्ता पारंपरिकतेला धरून घरी बनवलेला आणि पौष्टिक तसेच पोट भरणारा असावा.
अनेक जणी सकाळी चहाबरोबर खारी अथवा बिस्किटे खातात; पण हा काही नाश्ता नव्हे. तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, साखरेचे पदार्थ, जंक फूड असे अन्न न्याहारीसाठी खाणे म्हणजे अनारोग्याचे ठरते. रोजचा नाश्ता टाळल्यास स्थूलता निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते.
मग, आरोग्यदायी नाश्ता कसा असावा? पोहे, उपमा, मिश्रपिठांचे घावण, पराठा, राजगिरा लाडू, आंबोळी, ऑम्लेट पोळी, उकडलेले अंडे, दूध अशा पदार्थांचा समावेश असल्यास तो पौष्टिक नाश्ता ठरतो. तसेच नाश्त्यासाठी पदार्थ ठरविताना ऋतू, काळाचासुद्धा विचार करावा. नाश्त्याबरोबर चहा, कॉफी किंवा सॉफ्टड्रिंक्स घेऊ नये.
सकाळी न्याहारी घेतली नाही तर आपले शरीर स्वत:च ग्लुकोज तयार करण्यास सुरुवात करते आणि नंतर दिवसभरात मिळणारे अन्न हे चरबीच्या रूपात शरीर साठवण्याचा प्रयत्न करू लागते. म्हणून सकाळी लवकरात लवकर नाश्ता करावा. मधुमेह असणार्या महिलांनी तर नाश्त्याला उशीर करूच नये. त्यांच्या नाश्त्यामध्ये उसळी, भाकरी, मेथीचा थेपला, दही अशा स्वरूपाचे अन्नपदार्थ असावेत. ज्या स्त्रियांची दुपारच्या जेवणाची वेळ निश्चित माहीत नसेल, अशांनी सकाळी घरून निघताना पोळी, भाजी, वरण, भात अशाप्रकारचे जेवण करूनच बाहेर पडावे. थोडक्यात, नाश्ता हा पारंपरिकतेला धरून घरगुती पौष्टिक आणि पोट भरणारा असावा.