नगर; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेतील निविदा घोटाळे, ठेकेदारांचे खोटे प्रतिज्ञापत्र, अधिकार्यांकडून त्यांना दिले जाणारे अभय, यावरून तक्रारी सुरू असताना, आता अधिवेशनातही नगरची जलजीवन योजना गाजणार आहे. उत्तर जिल्ह्यातील एका आमदाराने 'जलजीवन'च्या निविदा प्रक्रिया राबविताना काम वाटपात अपहार झाल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात 829 योजना घेण्यात आल्या आहेत.
त्यासाठी 1300 कोटींपेक्षा अधिक तरतूद केलेली आहे. मात्र, योजनेच्या कामांवरून तक्रारी सुरू आहेत. यापूर्वीही अधिकार्यांनी निविदांमध्ये गोंधळ घातल्याचे आरोप झालेले आहेत. त्यावरून आंदोलन, उपोषण झाली आहेत. गत आठवड्यातच खासदार सदाशिव लोखंडेंनीही 'जलजीवन'वरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना सुनावले. त्यानंतर हे प्रकरण थेट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांपर्यंत पोहचले. त्यामुळे नगरचा 'जलजीवन' विषय वादळी ठरत आहे.
आता, 'जलजीवन'च्या या गोंधळात उत्तरेतील महाविकास आघाडीच्या एका आमदारांनी लक्ष घातले आहे. त्यांनी नगर जिल्हा परिषदेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी निविदा प्रक्रिया राबविताना काम वाटपात अपहार केल्याबाबतचा थेट तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. तोंडावर आलेल्या अधिवेशनात हा प्रश्न गाजणार आहे.
यात, जिल्हा परिषदेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा विभागाने काम वाटपात अनियमितता केल्याचे दि.18 जानेवारी रोजी निदर्शनास आले असून, हे खरे आहे का, तसेच ते खरे असल्यास याप्रकरणी शासनाने चौकशी केली का, चौकशीमध्ये काय आढळून आले, काम वाटपात अनियमितता करणार्या संबंधितांवर कोणती कारवाई केली, कोणती कारवाई करण्यात येत आहे, जर नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
शासनाने मागविली माहिती
शासनाच्या अधिकार्यांनी नगर जिल्हा परिषदेला या संदर्भात पत्र काढून संबंधित तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने भागनिहाय उत्तर पूरक टिपण्णीसह तसेच उत्तरात नमूद बाबींच्या कागदपत्रांसह, निवेदनासह पाणीपुरवठा योजनांसाठी निविदा प्रक्रिया राबविताना काम वाटपात अपहार केल्याबाबत, चौकशी अहवालासह माहिती तातडीने पाठवावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.