मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी तब्बल आठ तास चौकशी केली. नेमक्या कोणत्या प्रकारणात ही चौकशी झाली, यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मात्र, यावर रविंद्र वायकर (ED and Ravindra Waikar) यांनी माध्यमांशी स्पष्टीकरण दिलं आहे.
रविंद्र वायकर म्हणाले, "आरोप वगैरे काही नाहीत. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यांना चौकशीचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी मला बोलावलं होतं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. बोलावल्यानंतर जाणं आणि स्पष्टीकरण देणं हे या देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे".
ईडीकडून (ED and Ravindra Waikar) कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर वायकरांनी ही माहिती उघड केली जाऊ शकत नाही, असं सांगितलं. पण, चौकशीदरम्यान केवळ एकच अधिकारी उपस्थित होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून चौकशी केली का, असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, "उद्धवसाहेब यांच्या जवळचा आहे म्हणून बोलवलं असं मला वाटत नाही. त्यांना काही शंका होत्या. त्यांचं निरसन केलं. त्यांनी बोलावलं म्हणूनच मी गेलो होतो", असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत. युती सरकारच्या काळात ते परिवहनमंत्री होते. 'ईडी'ने त्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये समन्स बजावले होते. त्यानुसार, वायकर हे मंगळवारी सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांची तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीबाबत ईडीने कमालीची गुप्तता बाळगली. गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. त्यात आता वायकर यांचीही भर पडल्याने चर्चांना एकच उधान आलं आहे.
पाहा व्हिडीओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद…