सप्तशृंगीगड : पुढारी वृत्तसेवा, उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगीदेवीचा नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होत असून, भाविकांना भगवतीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. दरम्यान १० ते १२ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील, असा अंदाज प्रशासनातर्फे व्यक्त केला जात आहे. यात्रा कालावधीत नांदुरी येथे वाहन पार्किंगची व्यवस्था होणार आहे. (Saptashrungi devi Mandir)
संबधित बातम्या :
उत्सवाच्या दृष्टीने कळवण येथील प्रांत तथा सहायक जिल्हा अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय विभागांची नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या चिंतन हॉल येथे झाली. कळवण येथील तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश नरवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यात्राेत्सव कालावधीत गडावर खासगी वाहनांना बंदी तर परिवहन महामंडळाच्या २२५ बसेस उपलब्ध राहणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. गडावरील स्थानिकांना महत्त्वाच्या कामासाठी, गावातील वाहनांना पासेसची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. स्वच्छतेसाठी कंत्राटी कामगारांची नेमणूक, तात्पुरती स्वच्छतागृहे, गावातील सर्व पथदीपांची दुरुस्ती करणार आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण व आरोग्य विभागाकडून सप्तशृंगी नांदुरी येथे वैद्यकीय सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका होणार आहेत. तसेच रुग्णांसाठी ट्रस्ट व जिल्हा परिषद आरोग्य विभाग रुग्णवाहिका उपलब्ध करणार आहे. (Saptashrungi devi Mandir)
जळगाव, धुळे व इतर ठिकाणी जाण्या-येण्यासाठी बसेस उपलब्ध करून देणार आहेत. भाविकांची गर्दी वाढल्यास जादा बस उपलब्ध करून देणार आहेत. अपघाती वळणावर वाहतूक नियंत्रण कक्ष उभारणार असून, भाविकांसाठी सप्तशृंगी गडावरील धोंड्या कोंड्याची विहिरीजवळ स्वतंत्र बसस्थानक उभारणार आहे. नांदुरी येथे खासगी वाहनांची व्यवस्था केली आहे.
15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत असून, सप्तशृंगी घाट रस्त्याची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीचे निर्देश दिले असून, यूटर्नजवळ आरसा बसविल्याने वाहनधारकांना ये-जा करणे सोपे होणार आहे.
विशाल नरवाडे, प्रांताधिकारी, कळवण
आढावा बैठकीत संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली कामे लवकर पूर्ण करावी. तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप पुन्हा आढावा बैठक घेणार आहेत.
देवीदास वारुळे, तहसीलदार, कळवण
हेही वाचा :