पणजी : पुढारी वृत्तसेवा विधानसभेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. गोव्याच्या मुक्तीला पंधरा वर्षे उशीर होण्यास तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे धोरणच कारणीभूत होते, याकडे पंतप्रधानांनी अंगुलीनिर्देश केला. यासाठी त्यांनी नेहरू यांच्या 15 ऑगस्ट 1955 च्या एका भाषणाचा हवालाही दिला. गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, सरदार वल्लभ भाई पटेल यांनी हैदराबाद मुक्तीसाठी योजना आखली. ते अशीच योजना गोवा मुक्तीसाठी आखू शकले असते. तसे करताना त्यांना नेहरू यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली शांतिदूत ही छबी आड आली. त्या वेळच्या वर्तमानपत्रांकडे नजर टाकली असता ही बाब ठळकपणे जाणवते.
आपली प्रतिमा जपण्यासाठी नेहरूंनी गोव्याच्या जनतेला विदेशी सत्तेच्या अमलाखाली खितपत ठेवले. ते म्हणाले, गोवा मुक्तीसाठी देशभरातून गोव्याकडे जाणारा सत्याग्रहींना मदत देण्याचे नेहरुंनी नाकारले. सत्याग्रहींच्या मागे सैन्य चालत नसते, अशी मुक्ताफळेही त्यांनी त्यावेळी उधळली होती. गोव्यातील तत्कालीन विदेशी सत्ता गोमंतकीयांवर अत्याचार करत असताना, गोळीबार करत असताना नेहरुंनी मात्र गोव्यात सैन्य पाठवणारच नाही, अशी ठाम भूमिका 15 ऑगस्ट 1955 रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून मांडली होती. देशाचा हा भाग मुक्त होण्यास नेहरूंमळेच उशीर झाला.
काँग्रेसचे नेते आता ऊठसूट अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत उपदेश करीत असतात. काँग्रेसचे सरकार असताना गोव्यातील मंगेशकर कुटुंबीयांपैकी हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीच्या नोकरीतून तत्काळ सेवामुक्त केले होते. वीर सावरकर यांचे गाणे आकाशवाणीवर सादर केले हा गुन्हा असल्याचे तत्कालीन काँग्रेस सरकारने मानले होते. नेहरूंवर टीका केल्यामुळे मजरूह सुलतानपुरी यांनाही एक वर्षाचा कारावास भोगावा लागला होता. अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
हेही वाचलत का?