Latest

भामा आसखेड धरणातून खेड तालुक्यासाठी आवर्तन

अमृता चौगुले

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  खेडच्या भामा आसखेड धरणाचे आयसीपीओमधून 1 हजार क्युसेकने विसर्ग भामा नदीपात्रात गुरुवारी (दि. 8) सुरू करण्यात आला. या पाण्याने तालुक्यातील भीमा व भामा नदीवरील 8 बंधारे भरणार असून, या पाण्याचा फायदा उन्हाळी पिकांसह पिण्याच्या पाणी योजनांना होणार आहे. भामा आसखेडमधून पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी धरणातून पाणी सोडण्याची सूचना धरण उपविभागाचे सहायक अभियंता अश्विन पवार यांना केली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी 10 वाजता धरणाचे आयसीपीओमधून विसर्ग सुरू करण्यात आला. तालुक्यातील भामा व भीमा नदीवरील शेलगावपर्यंतचे कोल्हापूर पद्धतीचे 8 बंधारे यामधून भरणार आहेत. धरणातून पाणी सोडल्यानंतर नदी काठच्या शेतकर्‍यांना सावध राहण्याच्या सूचना धरण प्रशासनाने दिल्या आहेत. शेतकर्‍यांच्या पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे शेती पिकांना आणि नदीकाठी असणार्‍या गावच्या पाणी योजनांना होणार आहे. पाणी सोडल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

धरणात 5.52 टीएमसी साठा
भामा आसखेड धरण 8.14 टीएमसी क्षमतेचे असून, सध्या धरणात 5.52 टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी 667.20 दशलक्ष घनमीटर आहे.एकूण पाणीसाठा 169.696 दशलक्ष घनमीटर, तर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 156.173 दशलक्ष घनमीटर आहे. धरणातील पाण्याची टक्केवारी 71.93 आहे. धरणातील पाण्याचा फायदा भामा-भीमा नदीवरील सर्व बंधारे भरल्यानंतर विसर्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती धरण विभागाचे शाखा अभियंता नीलेश घारे दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT