पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील दतिया येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेंडा गावात जमिनीच्या वादातून अंदाधूंद गोळीबाराची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत पाच जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत. दतिया हा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. आज सकाळी शेतातून गुरे पळवण्यावरून दोन गट आमने-सामने आल्यानंतर हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.१३) सकाळी दतिया येथील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील रेंडा गावात जमिनीचा वाद सोडवण्यासाठी पाल आणि डांगी समाजातील लाेक पंचायतीमध्ये एकत्र आले. यावेळी वाद झाला. पंचांनी शांत राहण्याचे आवाहन केले. पण, काही उपयोग झाला नाही. काही वेळातच वाद वाढत जाऊन हिंसक वळण लागले. हाणामारीनंतर गाेळीबार झाला.
पाच मृतांपैकी तीन डांगी समाजाचे तर दोन पाल समाजाचे आहेत. ६ जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पाेलिसांनी धाव घेतली. परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.