इंदूर; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात महाराष्ट्राच्या एसटी बसला आज सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. ही बस इंदूरहून अमळनेरला येत होती. जळगाव एसटी डेपोची ही बस खलघाट येथील संजय सेतू पुलावरून २५ फूट खोल नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ जण ठार झाले असून. १५ जणांना वाचवण्यात आले. दरम्यान, अद्याप २५ ते २७ लोक बेपत्ता असून नदीपात्रात बचावकार्य सुरु आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुःख व्यक्त केले आहे. खलघाट येथील हृदयद्रावक दुर्घटनेने आपल्या अनेक लोकांना आपल्यापासून दूर नेले. हृदय दु:ख आणि वेदनांनी भरलेले आहे. या दुःखात मी शोकाकुल कुटुंबियांसोबत आहे, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत म्हटले आहे.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन९८४८ क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली.
दरम्यान, एस.टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे.
[visual_portfolio id="263903"]
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, खलघाटमध्ये अपघात होण्याआधी एसटी बस १० मिनिटे थांबली होती. १० मिनिटांचा ब्रेक घेतल्यानंतर बस खलघाट येथून निघाली होती. त्यानंतर काही वेळातच बस नर्मदा नदीत कोसळली. समोरुन चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर बसचा चक्काचूर झाला. बस नदीतून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. घटनास्थळी पोलीस आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. बस २५ फुटावरून नदीत कोसळल्याने ती नदीत बुडाली. यामुळे प्रवाशांना वाचण्यासाठी संधीच मिळाली नाही.
1) चालक – चंद्रकांत एकनाथ पाटील
2) वाहक – प्रकाश चौधरी
3) निंबाजी आनंद पाटील
4) कमलाबाई आनंद पाटील
5) चेतन गोपाल जांगिड
6) जगन्नाथ हेमराज
7) सैफुद्दीन अब्बास
8) अरवा मूर्तजा
यातील काही अमळनेर, इंदूर आणि राजस्थानचे रहिवासी आहेत.