निपाणी : प्रतिनिधी
काँग्रेसच्या काळात केंद्रात पंतप्रधान मनमोहनसिंग सरकार असताना 75 हजार कोटींची कर्जमाफी व कर्नाटकात गतवर्षी सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री सिध्दरामय्या सरकारने सरसकट शेतकर्यांची 50 हजाराची कर्जमाफी केली. गरिबांसाठीच्या योजना तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम काँग्रेसनेच केले, असा दावा महसूल मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी व्यक्त केला.बुधवारी सकाळी मंत्री देशपांडे यांनी चिकोडीचे काँग्रेस उमेदवार खा. प्रकाश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशपांडे म्हणाले, काँग्रेसने देशाचे रक्षण व संरक्षणासाठी त्याग केला आहे. पक्षाने सामान्य जनता केंद्रस्थानी मानून महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या आहेत. खा. प्रकाश हुक्केरी यांनी केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार असताना सर्वाधिक 750 कोटींची विकासकामे राबविली आहेत.
देशात मोदींची लाट असल्याची हवा उठली असली तरी ती केवळ अफवा आहे. केंद्रातील मोदी सरकारमुळे जनतेचे हाल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान राहूल गांधी असतील, असाही दावा देशपांडे यांनी केला..
यावेळी खा. प्रकाश हुक्केरी, आ. महांतेश कौजलगी, माजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, वीरकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, जि. पं. सदस्य राजेंद्र वडर उपस्थित होते.