वरठान : प्रतिनिधी
धारकुंड (बनोटी) (ता.सोयगाव) येथील धबधब्याजवळ सेल्फी घेण्याच्या नादांत पाय घसरुन खोल पाण्याच्या कुंडात पडल्याने एका एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. १२) रोजी घडली. तब्बल चौदा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आज मंगळवारी तरुणाचा मृतदेह सापडला असून, तरुणाचे नाव अविनाश राजू पवार (वय २१) असे आहे. तो वाकी (ता कन्नड) येथील रहिवाशी आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, बनोटी गावापासून सात किलोमीटर अतंरावर धारकूड हे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा पर्यटक तसेच भाविकांच्या आकर्षणाचा केंद्र आहे. बाजुला खडकाच्या कपारामध्ये महादेवाची पिंड आहे. श्रावण महिन्यात नेहमी भाविकांची याठिकाणी गर्दी होत असते.
श्रावण महिण्यात परिसरासह घाटमाथ्यावरील तरुण मोठ्या प्रमाणात पर्यटन तसेच दर्शनासाठी या मंदिरात येत असतात. वाकी येथील तरुण अविनाश देखील सोमवारी मित्रासोबत धारकूंड येथे आला होता. तीनशे फुटावरुन कोसळणार्या धबधब्याजवळ सेल्पी घेण्याचा मोह यावेळी अविनाशला आवरता आला नाही. यावेळी सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि तो खोल कुडांमध्ये जावुन पडला. यानंतर बराच वेळ होऊन देखील अविनाश पाण्यावरती आलाच नसल्याने काही तासानतंर जवळपास दहा ते विस तरुणांनी कुडांमध्ये उतरुन अविनाशचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही.
हा जंगलाचा परिसर असल्याने तसेच या ठिकाणी कोणतीही उजेडाची व्यवस्था नसल्याने तरुण माघारी परतले. आज पुन्हा मंगळवार (ता. १३) सकाळ पासून शोध घेण्यात आला असता, सकाळी अकरा वाजता अविनाशचा मृतदेह सापडला. मृतदेह बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केद्रात उत्तरीय तपासणीसाठी आणल्यावर आरोग्य अधिकारी नसल्याने मृतदेह चिंचोली येथे नेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून वाकी येथील स्मशानभूमीमध्ये दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीन असा परिवार आहे. अविनाश हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे असे दुख:द निधन झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार सुभाष पवार, कौतीक सपकाळ, दिपक पाटील, प्रदीप पवार आदी तपास करीत आहेत.
देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे...
अविनाश वयाच्या पंधरा वर्षापासून लकष्कात भरती होउन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. लष्कराच्या अनेक ठिकाणी झालेल्या भरती प्रक्रियेत त्याने सहभाग घेतला होता. मात्र दुर्देवाने अविनाशचे स्वप्न अपूर्णच राहिले.